Thursday, July 2, 2009

आद्य शंकराचार्य - काही प्रसंग

एके दिवशी आचार्य त्यांच्या शिष्यांसमवेत गंगास्नानाकरिता चालले असता त्यांना वाटेत एक चांडाळ कुत्र्यांना घेऊन जाताना दिसला. शिष्यांनी ओरडून त्याला वाटेतुन बाजुला होण्यास सांगितले. चांडाळाने आचार्यांना विचारले, पूज्य गुरुदेव, आपण अद्वैत वेदांताचे महान उपदेशक असुन अजुनही माणसा माणसांमधे भेद करता ? हे तुमच्या अद्वैतवादाच्या शिकवणीशी सुसंगत आहे का ? अद्वैत हे केवळ पुस्तकी ज्ञान आहे का ? चांडाळाच्या बुद्धिमान प्रश्नाने आचार्य चमकले. त्यांना मनोमन वाटले की प्रत्यक्ष भगवान शिव आपल्याला धडा शिकविण्यासाठी या रूपात प्रकट झाले असावेत. त्यांनी लगेच मनिषा पंचक नावाचे पाच श्लोकी स्तोत्र रचले, त्यातल्या प्रत्येक श्लोकाच्या शेवटी जी ऒळ (धृवपद) येते त्याचा अर्थ असा आहे...
जो कोणी मला प्रत्येक गोष्टीकडे अद्वैत दृष्टिकोनातुन पहायला शिकवतो, तो माझा खरा गुरु होय. मग तो ब्राह्मण असो की चांडाळ...

तिर्थक्षेत्र काशी येथे एक विद्यार्थी संस्कृत व्याकरणाचे नियम घोकत बसला होता. तो सारखे "डुकृञ करणे", "डुकृञ करणे" असे म्हणत होता. त्या मुलाचे चिकाटीचे प्रयत्न पाहिले आणि आचार्यांनी तत्काळ एक छोटे काव्य रचून ते गाऊन दाखविले. हेच ते प्रसिद्ध स्तोत्र "भज गोविंदम भज गोविंदम मूढमते". यातुन त्यांनी अशा घोकंपट्टीच्या शिक्षणाचा मुक्तीच्या दृष्टीने असलेला फोलपणा दाखवून दिला. या स्तोत्राचे धृवपद असे आहे...

भज गोविंदम, भज गोविंदम
गोविंदम भज मूढमते
संप्राप्ते सन्निहिते काले
नहि नहि रक्षति डुकृञ करणे

अर्थ : अरे मूढ मना, गोविंदाचे नामस्मरण कर, अंतकाळी हे व्याकरणाचे नियम मदतीला येणार नाहीत.

एकदा काही खोडकर विक्रेत्यांनी आचार्यांना मांस आणि मदिरा अर्पण केली. आचार्यांनी उजव्या हाताने स्पर्श केल्यावर मांसाचे सफरचंदात आणि मदिरेचे दुधात रूपांतर झाले.

आणखी एका प्रसंगात कापालिक पंथाच्या लोकांनी येऊन आचार्यांकडे भेट म्हणुन त्यांचेच शिर (डोके) मागितले. आचार्य या मागणीला कबूल झाले व म्हणाले की जेव्हा मी एकटाच ध्यानमग्न असेन तेव्हा तुम्ही खुशाल माझे शिर घेऊन जाऊ शकता. त्याप्रमाणे कापालिक मोठी तलवार घेऊन आचार्यांचे शिर कापण्यासाठी आले, त्याचवेळेस अचानक आचार्यांचा परमशिष्य पद्मपाद तेथे आला आणि त्याने कापालिकांच्याच तलवारीने त्यांचे हात कापले. पद्मपाद हा नरसिंहाचा भक्त होता. असे म्हणतात की प्रत्यक्ष नरसिंहानेच पद्मपादाच्या शरिरात प्रवेश करून आचार्यांचे रक्षण केले.

ईंग्रजी वेबसाईटवरील चरित्रात नसलेला एक प्रसंग देत आहे. सत्यासत्यतेची खात्रीशीर माहिती नसल्याने क्षमस्व.
शंकराचार्यांच्या उदयाच्या आधीपासुन बौद्धधर्माचा प्रसार भारत तसेच पुर्वेकडील अनेक देशांमधे वेगाने झाला होता. जरी बौद्धधर्म हा बळाच्या जोरावर प्रसारित झाला नसला तरी काही ठिकाणी असा प्रचार होता की बौद्ध धर्माच्या व्यक्तीने स्पर्श केल्यास ज्याला स्पर्श झाला ती व्यक्ती पण बौद्ध झाली. हा धर्मप्रसाराचा अत्यंत जलद आणि बुद्धिमान मार्ग होता. हे समजल्यावर शंकराचार्यांनी त्या भागात जाऊन असा प्रचार केला की मी व माझे शिष्य या सर्व भागातुन संचार करीत असताना शंखनाद करत जाणार आहोत. जो कोणी आमचा शंखनाद ऐकेल तो हिंदू (वैदिक) धर्माचा होईल. हा आधीच्या मार्गापेक्षा जलद आणि बुद्धिमान मार्ग होता.

Friday, October 3, 2008

आद्य शंकराचार्य - शृंगेरी मठ

म्हैसुरच्या वायव्येला, पश्चिम घाटाच्या पायथ्याशी सुंदर अरण्यांनी वेढलेल्या भागात शृंगेरी गाव आहे. येथेच शंकराचार्यांनी त्यांच्या पहिल्या मठाची स्थापना केली. तुंगभद्रेचीच एक शाखा असलेली तुंगा नदी मंदिराच्या अगदी जवळून वाहते. जसे गंगा स्नान पवित्र मानले जाते, तसेच तुंगेचे स्वच्छ, पारदर्शक पाणी तिर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. (गंगा स्नानम्, तुंगा पानम् असे म्हणले जाते) शृंगेरी हे ठिकाण साधुता आणी पावित्र्याने परिपुर्ण आहे. येथले सौंदर्य पहाण्यासाठी अवश्य भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. या मठाला आजवर अनेक भक्त भाविकांनी भेट देऊन या स्थानाच्या महानतेचा आदर केला आहे. याचे कारण स्वामी विद्यारण्यांसारख्या अनेक महान लोकांनी मठाचे प्रमुख पद भुषविले आहे. हे सर्वजण मठाच्या संस्थापकांएवढेच ख्यातकिर्त होते.

विद्यारण्यस्वामींनी संस्कृतमधे लिहिलेल्या सायन नामक ऋग्वेदावरील भाष्याचा अनुवाद करण्यासाठी प्रसिद्ध जर्मन तत्वद्न्य व संस्कृतचे अभ्यासक प्रो.मॅक्समुल्लर यांना तब्बल तीस वर्षे लागली होती. मॅक्समुल्लर यांनी अनुवादाच्या प्रस्तावनेत असे नमुद केले आहे, तीस वर्षातला एकही दिवस असा गेला नाही की निदान दहा मिनिटे का होईना अनुवादाचे काम केले नाही. जेव्हा सायन ग्रंथातील मजकुर त्याच्या जिर्णतेमुळे काही ठिकाणी समजत नव्हता, तेव्हा त्याकाळच्या म्हैसूरच्या महाराजांच्या मदतीने, मॅक्समुल्लर यांनी शृंगेरी मठातील मुळ हस्तलिखित संदर्भासाठी मिळविले होते.

श्रीशारदा मठ हा सर्व प्रकारच्या भक्तांना सारख्याच प्रमाणात आकर्षित करून घेतो. भारतामधे अनेक मठ, आश्रम असे आहेत की ज्यांचे प्रमुखपद कोणी ना कोणी महान, पवित्र व्यक्ती अथवा त्यांची गादी चालविणारे शिष्य भुषवित आहेत, तसेच या मठांमधे भारताच्या सर्व भागातून हिंदू भाविक एकत्र जमतात, पण यापैकी कोणताच मठ आद्य शंकराचार्यांचे मुळ पीठ शृंगेरी मठाएवढा प्रसिद्ध नाही. शृंगेरी पीठ हे जगातील जुन्या मठांपैकी असून, गेली बारा शतके (१२०० वर्षे) त्याची विजय पताका डौलाने फडकते आहे. आचार्यांनी स्थापन केलेल्या चार पीठांपैकी हे पहिले द्न्यानपीठ आहे (आणखी तीन म्हणजे पुरी, द्वारका, ज्योतिर्मठ). ही चारही पीठे हिंदूंना आदरणीय असलेल्या चार वेदांचे जणू प्रतिनिधित्वच करत आहेत.

आचार्यांनी त्यांच्या चार शिष्यांची (सुरेश्वर आचार्य, पद्मपाद, हस्तामलक, त्रोटकाचार्य) अनुक्रमे शृंगेरी, पुरी, द्वारका आणी जोशीमठ या पीठांच्या प्रमुखपदी नेमणूक केली. या गुरूपरंपरेतील सर्वात प्रसिद्ध संन्यासी अर्थातच विद्यारण्यस्वामी आहेत. ते वेदांचे महान भाष्यकार तसेच विजयनगर साम्राज्याचे शिल्पकार होते. आधी ते विजयनगरचे दिवाण होते, त्यांनी साधारण ई.स.१३३१ मधे संन्यास घेतला. विद्यारण्यस्वामींच्या आधी शृंगेरीपीठाचे अकरा गुरू होऊन गेले, ते असे, शंकराचार्य, विश्वरूप, नित्यबोधघन, द्न्यानघन, द्न्यानोत्तम, द्न्यानगिरी, सिंहगिरीश्वर, ईश्वरतिर्थ, नरसिंहतिर्थ, विद्याशंकरतिर्थ आणी भारतीकृष्णतिर्थ.

शृंगेरी मठ हे असे ऐतिहासिक, पवित्र धर्मासन आहे जे व्याख्यान सिंहासन अर्थात द्न्यानाचे आसन म्हणून ओळखले जाते. हे आसन आद्य शंकराचार्यांना त्यांच्या तत्वद्न्यानातील अथांग विद्वत्तेचा गौरव करण्यासाठी प्रत्यक्ष सरस्वतीनेच बहाल केले आहे असे मानले जाते. आजवर या विद्वत्तेच्या आसनाचे प्रमुखपद पस्तिसहून जास्त आचार्यांनी भुषविले असुन गुरू परंपरा अखंड चालू ठेवली आहे.

आद्य शंकराचार्यांनी संन्याशांचे दहा प्रकार (दशनामी) रूढ केले. संन्याशांनी पुढील दहापैकी एक उपनाम (पद) त्यांच्या नावापुढे जोडायचे. सरस्वती, भारती, पुरी (शृंगेरी मठासाठी तीन), तिर्थ, आश्रम (द्वारका मठासाठी दोन), गिरी, पर्वत, सागर (जोशी मठासाठी तीन), वन आणी अरण्य (गोवर्धन मठासाठी दोन). परमहंस ही उच्च पदवी असुन, ती या सर्व श्रेणींच्याही वर आहे. खुप काळ वेदांताचा अभ्यास, ध्यान तसेच आत्मानुभुती याद्वारे परमहंस पदापर्यंत पोहोचता येते. अतीवर्णाश्रमी हे सर्व जातीधर्मांच्या तसेच भौतिक जीवनाच्या पलीकडे असून ते कोणत्याही जातीच्या, वर्णाच्या लोकांबरोबर जेवू शकतात. आचार्यांच्या परंपरेतील संन्यासी भारतात सर्वत्र आढळतात.

Sunday, September 28, 2008

आद्य शंकराचार्य - अखेर

शंकराचार्य कामरूपला (आताचे आसाम मधील गुवाहाटी) गेले. तेथे त्यांनी शाक्तपंथाचा भाष्यकार अभिनवगुप्त बरोबर वादविवाद करून त्यामधे जय मिळविला. अभिनवगुप्ताने पराभवाचा राग मनात ठेवून आचार्यांवर काही दुष्ट शक्तींचे प्रयोग केले, त्यायोगे आचार्यांना आत्यंतिक शारीरिक व्याधींचा त्रास होवू लागला. पद्मपादाने त्या दुष्ट शक्तींचा प्रभाव दूर केल्यावर त्यांना बरे वाटू लागले. यानंतर ते हिमालयात गेले, तेथे त्यांनी ज्योतिर्मठाची (जोशी मठ) स्थापना केली, तसेच बद्रीधाम मंदिराची स्थापना केली. तेथून पुढे आचार्य, हिमालयातील ऊंच ठिकाणी असलेल्या केदारनाथ या ठिकाणी गेले.


वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या (३२) वर्षी या महान आत्म्याने, केदारनाथच्या शिवलिंगामधे एकरूप होऊन ईहलोकाचा निरोप घेतला.

आद्य शंकराचार्य - मातेची भेट

कालांतराने शंकराचार्यांना त्यांची आ‌ई बराच काळ आजारी असल्याची बातमी कळाली. ते त्यांच्या शिष्यांना बरोबर न घेता एकटेच कालडीला जाण्यास निघाले. त्यांची आ‌ई अगदीच आजारी असून तिला उठता येणे शक्य नव्ह्ते. आचार्यांनी अतीव आदराने आ‌ईच्या पायास स्पर्श करून तिला नमस्कार केला. मग त्यांनी हरीची प्रार्थना केली. हरीचे दूत आले. आचार्यांच्या मातेने देहत्याग केला आणी तिने हरीदूतांसमवेत स्वर्गारोहण केले.


शंकराचार्यांना त्यांच्या आ‌ईचे अंत्यविधी करण्यामधे खुपच अडचणी आल्या. सहसा संन्यासीलोक गृहस्थाश्रमातली कर्तव्ये आचरत नाहीत. सर्व नंबुद्री ब्राह्मण आचार्यांच्या विरोधात होते. एवढेच नाही तर त्यांना त्यांच्या नातेवा‌ईकांनी देखील काही मदत केली नाही. कोणीही त्यांच्या मातेचे पार्थिव शरीर अंत्यसंस्काराच्या जागेपर्यंत घे‌ऊन जाण्यास तसेच अग्निसंस्कारास मदत केली नाही. अखेर आचार्यांनी सर्वकाही स्वतःच करण्याचे ठरविले. मातेचे शरिर एकट्याला नेता येणार नाही म्हणून त्यांनी त्याचे तुकडे केले आणी ते घराच्या मागील बाजुस नेले. केळीच्या झाडाची खोडे जमा करून त्यांनी चिता तयार केली आणी सर्व तुकडे त्यावर ठेवून योगसामर्थ्याने अग्नि प्रकट केला. शंकराचार्यांना नंबुद्री ब्राह्मणांना धडा शिकवायचा होता म्हणुन त्यांनी तिथल्या गावप्रमुखाला असे फर्मान जारी करण्यास सांगितले की, नंबुद्री ब्राह्मणांनी त्यांच्या घराच्या जवळचा एक कोपरा अंत्यविधीसाठी राखुन ठेवावा, आणी घरातील कोणी व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या पार्थिवाचे तुकडे करून त्या राखीव जागेमधे अंत्यसंस्कार करावेत. नंबुद्री ब्राह्मणांमधे आजतागायत ही प्रथा चालू आहे. (हा अनुवाद असल्यामुळे या माहितीची खात्री देता येत नाही.)


या घटनेनंतर आचार्य शृंगेरीला परतले. तेथपासुन त्यांनी अनेक शिष्यांसमवेत भारताच्या पुर्वकिनाऱ्याची यात्रा केली. ते जेथे गेले तेथे त्यांनी अद्वैत तत्वद्न्यानाचा प्रचार केला. त्यांनी पुरी येथे गोवर्धन मठाची स्थापना केली. कांचीपुरम येथे जाऊन शाक्तपंथीयांशी वादविवाद केला. चौल, पांड्य राज्यांमधे जाऊन वादविवादात जय मिळविला. उज्जैन येथे जाऊन भैरवांच्या दुष्ट कृत्यांना आळा घालून मानवी रक्तपात थांबविला. द्वारकेला मठाची स्थापना केली. यानंतर त्यांनी गंगेच्या किनाऱ्यावर भ्रमण करून अनेक महत्वाच्या व्यक्तींबरोबर आध्यात्मिक वादविवाद केले.

आद्य शंकराचार्य - दिग्विजय

शंकराचार्यांचे तत्वद्न्यानातील विजय हे जगात एकमेवाद्वितीय आहेत. त्यांनी काशीक्षेत्री शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संपुर्ण भारतभ्रमण केले त्यामधे ठिकठिकाणी झालेल्या वादविवादात सर्वत्र त्यांना विजय प्राप्‍त झाला. त्या काळात असलेल्या अनेक विद्यापीठे, गुरूकुल, मठ, ई. च्या प्रमुखांना ते भेटले. त्यांच्याशी चर्चा करून आचार्यांनी त्यांना वैदिक धर्माचे सत्यत्व, महत्व पटवून दिले, जे त्यांनी त्यांच्या भाष्ये, टिका, ई. साहित्यात लिहिले आहे. त्या काळात नावाजलेल्या सर्व प्रमुख पीठांकडे ते गेले. त्यातील सुप्रसिद्ध तत्ववेत्त्यांना चर्चेचे आवाहन केले, आणी चर्चे‌अंती त्या सर्वांची मते व दृष्टिकोन बदलविण्यात सफल झाले. आचार्यांनी भट्‍ट भास्कर याला वादात हरवून त्याने लिहिलेल्या वेदांतसूत्रावरील भाष्यामधील चुका दाखवून दिल्या. नंतर त्यांनी दंडी व मौर्य यांना तत्वद्न्यान शिकविले. तदनंतर खंडन खंडन खाद्य या पुस्तकाचा लेखक हर्ष (बहुधा कुमारील भट्‍ट असावा) याला तसेच अभिनवगुप्‍त, मुरारीमिश्र, उदयनाचार्य, धर्मगुप्‍त, कुमारील, प्रभाकर, ई. विद्वानांना वादविवादात हरविले.



शंकराचार्य महिष्मतीला गेले. त्यावेळी तेथील दरबारात प्रमुख पंडित होता मंडनमिश्र. मंडनमिश्राचा कर्मयोगावर दृढ विश्वास असल्याने त्याचा संन्यासमार्गावर अत्यंत राग होता. नेमका मंडन श्राद्धविधी करीत असताना आचार्य तेथे उपस्थित झाले. त्यांना पहाताच मंडनच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आणी सर्वांदेखत त्यांच्यात कटू संभाषण सुरू झाले. श्राद्धासाठी जमलेल्या ब्राह्मणांनी मध्यस्थी करून त्यांना शांत केले. मग आचार्यांनी मंडनमिश्रास धर्मचर्चेचे आवाहन केले आणी मंडनने ते स्विकारले. या चर्चेला मध्यस्थ (पंच) म्हणून प्रगल्भ विद्वत्ता असलेली मंडनची बायको भारती हिला नेमले गेले. उभयपक्षी असे ठरले की, जर शंकराचार्यांचा वादविवादात पराजय झाला तर त्यांनी विवाह करून गृहस्थाश्रम स्विकारायचा आणी जर मंडनमिश्राचा पराजय झाला तर त्याने संन्यास घे‌ऊन त्याच्या पत्‍नीच्या भारतीच्या हातून संन्यासवेष स्विकारायचा. खर्‍या तळमळीने वादविवाद सुरू झाला आणी अनेक दिवस विनाव्यत्‍यय चालू राहीला. भारती पंच असूनही वादविवादाच्या ठिकाणी थांबून चर्चा ऐकत बसली नाही, तर तिने दोघांनाही चर्चेच्या वेळी गळ्यात हार (पुष्पमाला) धारण करण्यास सांगितले आणी म्हणाली की ज्याचा हार आधी कोमेजण्यास सुरूवात हो‌ईल त्याने आपला पराजय कबूल करावा. मग ती नैमित्तिक गृहकृत्यांकडे लक्ष देण्यासाठी निघून गेली. त्या दोघांचा वादविवाद सतरा दिवस सुरू होता. त्यानंतर प्रथम मंडनमिश्रची पुष्पमाला कोमेजण्यास सुरूवात झाली. त्यामुळे त्याने पराजय मान्य केला आणी तो संन्यास घे‌ऊन शंकराचार्यांचा शिष्य होण्यास तयार झाला.



भारती ही विद्येची देवी सरस्वतीचा जणू अवतारच होती. एकदा दुर्वास ऋषींनी एका देवसभेमधे ब्रह्मा आणी त्याची पत्‍नी सरस्वती यांच्यापुढे वेदपठण केले. त्यामधे त्यांच्याकडून थोडी चूक झाली. यावर सरस्वती हसली. तेव्हा दुर्वासांनी संतप्‍त हो‌ऊन तिला पृथ्वीवर मानवलोकात जन्म घ्यावा लागेल असा शाप दिला. त्या शापामुळे सरस्वतीनेच भारतीच्या रूपाने जन्म घेतला असे समजले जात असे.



भारतीने वादविवादात हस्तक्षेप करून शंकराचार्यांना सांगितले की मी मंडनमिश्राची अर्धांगिनी आहे. तुम्ही फक्‍त मंडनचा पराभव केला आहे. आता तुम्हाला माझ्याबरोबर चर्चा करावी लागेल. यावर आचार्यांनी स्त्रियांबरोबरच्या चर्चेस आक्षेप घेतला. भारतीने स्त्रियांबरोबरच्या चर्चेचे ईतिहासातील अनेक दाखले दिले. मग आचार्य चर्चेस तयार झाले, आणी त्या दोघांचा वादविवाद देखील सतरा दिवस विनाव्यत्यय चालू राहिला. भारतीने अनेक शास्त्रांमागून शास्त्रांचा परामर्ष घेत वाद घातला, अखेर तिला लक्षात आले की आपण आचार्यांना सहजपणे हरवू शकत नाही. मग तिने कामशास्त्राचा आधार घे‌ऊन त्यांना हरविण्याचे ठरविले.



शंकराचार्यांनी कामशास्त्राचे द्न्यान नसल्यामुळे त्याच्या अभ्यासाकरीता वादविवाद थांबवून भारतीकडून एक महिन्याची मुदत मागितली. त्यास तिने मान्यता दिली. मग आचार्य महिष्मतीहून वाराणशीस गेले. तेथे त्यांनी योगविद्येने त्यांचा आत्मा शरिरापासून अलग करून, स्वतःचे पार्थिव शरिर एका झाडाच्या ढोलीत लपवून ठेवले, आणी आपल्या शिष्यांना आपण परत ये‌ईपर्यंत पार्थिवाची काळजी घेण्यास सांगितले. अमरूक नामक राजाचा मृत्यु झाला होता आणी त्याला अंत्यसंस्कारासाठी घे‌ऊन जात होते. आचार्यांच्या आत्म्याने त्या राजाच्या शरिरात प्रवेश केला आणी ते उठून बसले. मेलेला राजा अचानक जिवंत झाल्याने प्रजाजन आनंदी झाले.



राजाच्या बोलण्याचालण्यावरून राण्यांना तसेच मंत्रीवर्गाला लक्षात आले की जिवंत झालेला राजा नसून कोणा शुद्ध आचार विचारांच्या द्न्यानी, महान व्यक्‍तीचा आत्‍मा राजाच्या शरिरात वसतीला आला आहे. त्यामुळे त्यांनी गुप्‍तहेरांना आद्न्या केली की जवळपासच्या जंगलात, गुहेत कोणा साधू संन्याशाचे मृतशरिर लपवून ठेवले आहे का याचा शोध घ्या. त्या सर्वांनी विचार केला की असे मृतशरिर सापडले आणी ते नष्ट केले तर हा महान आत्मा आपल्या राजाच्या शरिरात पुढे बराच काळ राहू शकेल.



शंकराचार्य त्या राजाच्या राण्यांसोबत राहून प्रेमाचे अनुभव घे‌ऊ लागले. मायेची ताकद अफाट असते, त्या राण्यांसोबत रहात असताना आचार्य हे विसरून गेले की त्यांनी त्यांच्या शिष्यांना परत येण्याचे वचन दिले होते. काही काळाने शिष्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. शोध घेत असताना त्यांना अमरूक राजाच्या आकस्मिक जिवंत होण्याची बातमी कळाली. तातडीने त्या नगरात जा‌ऊन त्यांनी राजाची भेट घेतली. शिष्यांनी तत्वद्न्यानाशी संबंधित काही गाणी म्हणल्यावर शंकराचार्यांना सर्व काही आठवले. मग सारे शिष्य जेथे आचार्यांचे निष्प्राण शरिर लपवून ठेवले होते त्या ठिकाणी गेले. पण तोपर्यंत राण्यांच्या दूतांना त्या शरिराचा पत्ता लागला होता आणी त्यांनी ते शरिर दहन करायला सुरूवात केली. पण त्याचवेळी आचार्यांच्या आत्म्याने शरिरात प्रवेश केला आणी हरीची प्रार्थना सुरू केली. ईशकृपेने जोराचा पा‌ऊस आला आणी दहनाकरीता पेटविलेली आग विझली.



शंकराचार्य पुन्हा मंडनमिश्राच्या घरी गेले. भारतीबरोबरचा थांबलेला वादविवाद सुरू करून त्यांनी तिच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. मंडनमिश्राने त्याची सर्व मालमत्ता आचार्यांना भेट दिली, परंतू त्यांनी मंडनला ती सर्व मालमत्ता गरीब व गरजू लोकांना वाटण्यास सांगितले. मंडनने आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. आचार्यांनी त्याला संन्यासमार्गाची रीतसर दिक्षा दिली, आणी त्याला नविन नाव दिले ’सुरेश्वर आचार्य’. नंतरच्या काळात हेच सुरेश्वर आचार्य शृंगेरी मठाचे पहिले अधिपती झाले. भारती देखील त्यांच्याबरोबर शृंगेरीला गेली. तेथे तिची आजही पुजा केली जाते.



शंकराचार्यांनी भारताच्या सर्व भागातून वैदिक अभ्यासकांना बोलावून त्यांच्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. एक प्रकारे ते सर्वद्न्यतेच्या शिखरावर पोहोचले होते. आचार्यांनी त्यांच्या काळात असलेल्या विरोधी विचारांच्या धर्ममार्तंडांना नेस्तनाबूत करून वैदिक धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध केले. त्या काळात असलेल्या ७० ते ७२ पंथांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले. शंकराचार्य जगद्‍गुरू झाले.



शंकराचार्यांनी अन्य धर्मांविरोधातदेखील संपूर्ण यश मिळवले होते, एवढे की त्या नंतर आजतागायत ते धर्म भारतात डोके वर काढू शकले नाहीत. काही धर्म तर हद्दपार झाले. नंतरच्या काळात काही आचार्य उदयास आले, पण शंकराचार्यांप्रमाणे विरोधी विचारांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व कोणीही प्रस्थापित करू शकले नाही.

आद्य शंकराचार्य - गुरूच्या शोधात

गुरूच्या शोधात निघालेला बालशंकर हिमालयामधे बद्रिकाश्रम (बद्रिनाथ) येथे स्वामी गोविंदपाद आचार्य यांच्या मठात पोहोचला आणी त्याने मी आपला शिष्य हो‌ऊ ईच्छितो, अनुग्रह करावा अशी आचार्यांच्या चरणी प्रार्थना केली. आचार्यांनी त्याला नावगाव विचारले. तेव्हा तो म्हणाला, गुरूदेव, मी पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश या पंचमहाभुतांच्या पलिकडे असुन, अविनाशी आत्मा आहे. हे आत्मतत्व सर्व नावांमधे सर्व रूपांमधे भरून उरले आहे. नश्वर शरिराची ओळख करून देताना तो म्हणाला, मी केरळमधील ब्राह्मण असुन, शिवागुरू यांचा पुत्र आहे. मी लहान असतानाच माझे वडिल ईहलोक सोडून गेले. आ‌ईने माझे लालन पालन केले. स्थानिक शिक्षकांकडून मी वेदशास्त्रांचे अध्ययन केले. नदीमधे स्नानासाठी गेलो असता मगरीने माझा पाय धरला होता, तेव्हा मी अपथ संन्यास घेतला आहे. तरी मला शास्त्रशुद्ध संन्यासाची दिक्षा देण्याची कृपा करावी.



स्वामी गोविंदपाद यांना शंकरचे सत्यकथन ऐकून परम आनंद झाला. त्यांनी त्याला दिक्षा दे‌ऊन संन्यासवेष बहाल केला. गोविंदपादांनी त्याला अद्वैत तत्वद्न्याचे शिक्षण दिले. हे शिक्षण त्यांना त्यांचे गुरू गौडपाद आचार्य यांच्याकडून लाभले होते. शंकरने गुरूकडून तत्वद्न्यानाचे सर्व सिद्धांत आत्मसात करून घेतले. कालांतराने गुरुने त्याला काशीक्षेत्री जाण्याची आद्न्या केली. शंकरला त्याचे गुरू गोविंदपाद आणी परमगुरू गौडपाद यांच्याबद्दल अत्यंत आदर आणी अभिमान होता. शंकरने काशीक्षेत्री जा‌ऊन ब्रह्मसुत्रे, गीता, उपनिषदे यावर भाष्ये लिहिली. त्याचे हे लिखाण त्याच्या समकालीन तसेच पुर्वसुरींनी केलेल्या लिखाणाच्या तोडीचे, किंबहुना काकणभर सरसच होते. त्यानंतर त्याने भारतभ्रमण करून त्याच्या तत्वद्न्यानाचा प्रसार करण्यास सुरूवात केली. आणी असे करताना छोट्या शंकरचे महान तत्ववेत्ता आदिगुरू, जगद्‍गुरू शंकराचार्यात रूपांतर झाले.

आद्य शंकराचार्य - जन्म आणी बालपण

ई.स. ७८८ मधे शंकराचार्यांचा जन्म केरळमधील कालडी नावाच्या गावी झाला. कालडी रेल्वेस्थानक हे कोची - शोरानूर मार्गावर अल्वा‌ए (Alwaye) च्या ६ मैल पुर्वेस आहे. त्यांचा जन्म नंबुद्रीपाद (केरळीयन ब्राह्मण) घराण्यात झाला. राजशेखर नावाच्या जमीनदाराने कालडी गावी एक शंकराचे दे‌ऊळ बांधले. आणी त्या देवळाच्या सेवेत असलेल्या ब्राह्मण कुटुंबांसाठी जवळच एक छोटी ब्राह्मणवाडी तयार केली. केरळमधे अशा ब्राह्मणवाडीला अग्रहार (Agrahar) म्हणतात. विद्याधिराज नावाचा एक ब्राह्मण अग्रहारात राहुन देवळात पुजा करीत असे. त्याला शिवागुरु नावाचा एकुलता एक मुलगा होता. शिवागुरुने आवश्यक शास्त्राध्ययन करून योग्य वयात लग्न केले होते. त्याला बराच काळ मुलबाळ नव्हते. तो आणी त्याची बायको आर्याम्बा यांनी शंकराला केलेली प्रार्थना फळास ये‌ऊन त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले. उत्तरायणामधे, वसंत ऋतुतल्या एका सुंदर दुपारी, पवित्र अशा अभिजित मुहुर्तावर या मुलाचा जन्म झाला. हाच मुलगा पुढे जगद्‍गुरू शंकराचार्य झाला.



शंकर सात वर्षाचा असताना त्याचे वडिल शिवागुरू यांचे निधन झाले. त्यामुळे त्याचे शिक्षण कसे होणार हा प्रश्नच होता. त्याची आ‌ई एक असाधारण स्‍त्री होती. तिने शंकरला सर्व शास्‍त्रांचे शिक्षण मिळेल यासाठी खुप प्रयत्‍न केले. शंकरचे उपनयन (मौंजीबंधन) वयाच्या सातव्या वर्षी त्याच्या वडिलांच्या निधनानंतर झाले. त्याच्या बुद्धिमत्तेची असामान्य चमक लहानपणापासुनच दिसुन येत होती. वयाच्या सोळाव्या वर्षीच त्याला सर्व प्रकारचे तत्वद्न्यान तसेच ब्रह्मद्न्यान अवगत हो‌ऊन त्यामधे तो अधिकारी झाला होता. महान आश्चर्य म्हणजे त्याने वयाच्या सोळाव्या वर्षीच गीता, उपनिषदे, ब्रह्मसुत्रे यांवर भाष्ये लिहिली. (भाष्य = समालोचन अथवा सारांश)



शंकरच्या आ‌ईने त्याचे लग्न ठरविण्यासाठी त्याची पत्रिका अनेक भविष्यवेत्त्यांना दाखविली. पण शंकरने मात्र सर्वसंगपरित्याग करून संन्यास घेण्याचा पक्का निर्धार केला होता. या निर्णयामुळे आ‌ईला अतिशय दुःख झाले आणी तिला असे वाटू लागले की एकुलत्या एका मुलाने जर संन्यास घेतला तर आपले मरणोत्तर विधी, पिंडदान, ई. कोण करणार ? शंकरने आ‌ईला वचन दिले की मी तुझ्या मृत्युच्या आधी तुला भेटायला नक्की ये‌ईन, तसेच तुझे मरणोत्तर विधी देखील पुर्ण करेन. तरी देखील आ‌ईचे समाधान हो‌ऊ शकले नाही.



एके दिवशी तो आ‌ईबरोबर नदीवर स्नानाकरीता गेला असता, तो पाण्यात खेचला जा‌ऊ लागला, त्याला असे जाणवले की मगरीने त्याचा पाय धरला आहे. तो आ‌ईला जोरात ओरडून म्हणाला, माते, मेलो मेलो, मगर मला पाण्यात घे‌ऊन जात आहे, मला संन्यासी असताना मरण्याची ईच्छा आहे, मला ते सुख मिळू दे, आत्ता लगेच संन्यास घेण्याची मला परवानगी दे, मला अपथ संन्यास घे‌ऊ दे.



आ‌ईने ताबडतोब त्याला परवानगी दिली. आणी शंकरने अपथ संन्यास घेतला. ( अपथ संन्यास = मृत्यु जवळ आला असताना घेतला जाणारा संन्यास). पण त्यानंतर मगरीने त्याला ईजा न करता सोडून दिले. अशा प्रकारे शंकर पाण्यातुन संन्यस्त हो‌ऊन बाहेर आला. त्याने पुन्हा एकदा आ‌ईला दिलेल्या वचनाचा पुनरूच्चार केला. त्याने असलेली मालमत्ता नातेवा‌ईकांना दे‌ऊन त्यांना आ‌ईची काळजी घेण्यास सांगितले. आणी तो खर्‍या अर्थाने संन्यास घेण्यासाठी गुरूच्या शोधार्थ निघाला.